तुम्ही बदला; जग बदलेल! मसापच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात राजीव तांबेनी दिला मुलां

पुणे : आपल्याला बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते. कृती बदलायची असेल तर विचार बदला. विचार बदलायचे असतील भाषा बदला. भाषा बदलायची असेल तर मानसिकता बदला. तुम्ही बदला म्हणजे जग बदलेल. असा मंत्र साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी विद्यार्थ्यांना दिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमांतर्गत ते भावे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह माधव राजगुरू, दीपक करंदीकर आणि मुख्याध्यापक अरनाळे उपस्थित होते.
तांबे म्हणाले, "जो लढतो तोच जिंकतो. तुम्ही जे ठरवता ते तुम्ही करू शकता असा आत्मविश्वास बाळगा. जी माणसे मुहूर्त पाहून काम करतात. ती नेहमीच अपयशी ठरतात." तांबेंनी मुलांना दोन मंत्र दिले. १) मी जसा दिसतो तसा नाही. माझ्यात प्रचंड ताकद आहे. असे स्वतःला बजावा. २) मी ने ठरवितो ते मी करतोच. आत्तापासून असे ठरवा. प्रा. जोशी म्हणाले, "मुलांनो, भरपूर वाचा आणि खेळा. अभ्यासाच्या पुस्तकाच्या पलिकडे नवे जग आहे. ते साहित्याच्या माध्यमातून समजून घ्या. परिक्षेतील मार्क्स म्हणजे गुणवत्ता नव्हे. नेहमी पहिला नंबर मिळविण्याची इच्छा बाळगण्यापेक्षा व्यक्तीमत्त्व कसे बहुआयामी होईल याचा विचार करण्यासाठी साहित्याशी मैत्री करा."
जवलगेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
