चरित्र आणि चारित्र्य म्हणजे बिंब - प्रतिबिंब : डॉ. न. म. जोशी
परिषदेत कै. वामन मल्हार जोशी स्मृती व्याख्यान

पुणे : एखाद्या चरित्रनायकाचे खरेखुरे व चांगले चरित्र म्हणजे त्याच्या चारित्र्याचे प्रतिबिंब असते. म्हणून चरित्र व चारित्र्य याचा संबंध बिंब प्रतिबिंबासारखा असतो. पण हे बिंब चरित्रकार ज्या कोनात धरतो त्याप्रमाणे बिंबाचा आकार उमटतो. असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित कै. वामन मल्हार जोशी स्मृती व्याख्यान गुंफताना ते बोलत होते. 'मराठी साहित्य : चरित्र आणि चारित्र्य" हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते.
डॉ. न. म. जोशी म्हणाले, ' आधुनिक मराठी साहित्यातील चरित्रांमध्ये चरित्रलेखकाची भूमिका अभिनिवेशी उदासीन किंवा उदात्तीकरणाची आहे. असे बहुसंख्य चरित्रावरून दिसून येते. त्यामुळे चरित्रनायकाचे चारित्र्यहनन तरी होते किंवा अनाठायी उदात्तीकरण होते. इंग्रजी व फ्रेंच साहित्यात तटस्थ मूल्यमापनाची शैली प्रभावीपणे दिसून येते. मराठी साहित्यात फारच कमी प्रमाणात असे चरित्रलेखन होते. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'कादंबऱ्यांच्या माध्यमातून वामन मल्हार जोशी यांनी आपले नीतिविषयक विचार प्रकट केले. स्त्री स्वातंत्र्य, स्त्री शिक्षण,स्त्रियांचा सामाजिक दर्जा, ज्ञानाची श्रेष्ठता, ईश्वराचे अस्तित्व या विषयांचा उहपोह त्यांनी कादंबऱ्यांमधून केला. त्यांची वाङ्मयीन भूमिका एकांगी नव्हती ती व्यापक, उदार आणि सर्वसमावेशक होती. विवाहसंथा, घटस्फोट यासंबंधीचे त्यांनी व्यक्त केलेले विचार आजच्या काळातही पुरोगामी वाटतात.' सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. दीपक करंदीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.