top of page

मसाप ब्लॉग  

खेळ हा आरोग्याचा पाया : सदानंद मोहोळ

मसापचा कै. विलास शंकर रानडे स्मृतिपुरस्कार मनीषा बाठे याना प्रदान

खेळ आणि व्यायाम या गोष्टी आरोग्याचा पाया आहेत. कोणत्याही क्षेत्रात शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची असते. टक्केवारीच्या आग्रहापायी या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं, मुलांच्या हिताचे नाही असे परखड मत प्रख्यात माजी क्रिकेट खेळाडू सदानंद मोहोळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कै. विलास शंकर रानडे स्मृतीपुरस्कार प्रदान समारंभात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, मनीषा बाठे, वैशाली भट, परीक्षक शशिकांत भागवत उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कै. विलास शंकर रानडे क्रीडा पुरस्कार मनीषा बाठे लिखित 'गाथा क्रीडातपस्वीची' - वैद्य म. द. करमरकर यांचे चरित्र' या ग्रंथासाठी मनीषा बाठे आणि वैशाली भट यांना सदानंद मोहोळ यांच्या हस्ते देण्यात आला. प्रा. जोशी म्हणाले, 'उत्तम प्रकृती आणि सदृढ आरोग्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासणं गरजेचे आहे, हे त्रिकालाबाधित सत्य संतानीही सांगितले आहे. खेळांमुळे खिलाडूवृत्ती वाढते. आज त्याची समाजाला गरज आहे. पराभव पचवण्याचे सामर्थ्य त्यातून लाभते, क्रीडाविषयक लेखनाने साहित्याचे दालन समृद्ध होते'.

मनीषा बाठे म्हणाल्या, 'महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला सभ्यता आहे. कारण, जाती धर्म, वर्णाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना खेळ शिकवणारे क्रीडाशिक्षक येथे होऊन गेले. क्रीडा इतिहासाबद्दल लोकांची मते फारशी बरी नसताना 'गाथा क्रीडतपस्वीची' या क्रीडा पुस्तकाला पुरस्कार मिळणे कौतुकास्पद आहे. मुलींनी खेळामध्ये यावे, यासाठी वैद्य म. द. करमरकर आग्रही होते.'

या पुरस्कारासाठी ग्रंथाची निवड, क्रीडापत्रकार मिलिंद ढमढेरे आणि शशिकांत भागवत यांच्या निवड समितीने केली. शशिकांत भागवत यांनी या समारंभात ग्रंथनिवडीविषयी समितीची भूमिका स्पष्ट केली. मसापच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी आभार मानले. कार्यवाह बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page