प्राध्यापकांच्या विद्वत्तेचा दरारा कमी झाला आहे का ?

डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचा सवाल, डॉ. जोगळेकर पुरस्कार वितरण
दिवसेंदिवस महाविद्यालयात वर्गात तासाला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटते आहे. हे चिंताजनक आहे. प्राध्यापकांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. पूर्वी व्यासंगी प्राध्यापकांच्या तासांना त्या विषयाचेच नव्हे तर अन्य विषयांचेही विद्यार्थी उपस्थित राहत असत. एवढा प्राध्यापकांच्या विद्वत्तेचा दरारा होता. आज तो का कमी झाला आहे ? याचे चिंतन केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणार (कै.) डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध समीक्षक डॉ. ल. रा. नसिराबादकर यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समीक्षक डॉ. विलास खोले, नसिराबादकर यांच्या कन्या सुनीता लेंगडे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, पराग जोगळेकर, उज्ज्वला जोगळेकर उपस्थित होते.
शेजवलकर म्हणाले, "डॉ. गं. ना. जोगळेकर यांनी परिषदेला नावारूपाला आणले. ते ज्ञानसंपन्न प्राध्यापकांच्या पिढीचे प्रतिनिधी होते. ज्ञानाची श्रीमंती हेच प्राध्यापकांचे खरे वैभव आहे. ते आज दुर्मिळ होत चालले आहे."
डॉ. विलास खोले म्हणाले, "डॉ. गं. ना. जोगळेकरांनी अत्यंत कार्यक्षमतेने परिषदेचा कारभार पाहिला. त्यांच्या कार्याची मुद्रा परिषदेच्या कारभारावर उमटली आहे. मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रकल्प त्यांनी मार्गी लावला. दुरून कोरडे भासणारे जोगळेकर अतिशय रसिक होते."
नसिराबादकर म्हणाले, "व्यक्तिनिष्ठा, ज्ञाननिष्ठा व समाजनिष्ठा हे जोगळेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष होते आणि त्याला सहृदयतेचे कोंदण होते. साहित्य परिषद म्हटले की, जोगळेकर सर असे समीकरण संवेदनशील मनात कोरले गेले.
प्रा. जोशी म्हणाले, "डॉ. जोगळेकर हे साहित्य संस्थांचा आधारवड होते. निरपेक्ष आणि निरलस वृत्तीने संस्थात्मक कार्य कसे पुढे नेता येते याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी परिषदेच्या कार्यातून निर्माण केला." यावेळी उज्ज्वला जोगळेकर, सुनीता लेंगडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.