top of page

मसाप ब्लॉग  

'समाजात कलात्मक उद्यमशील अभिजातता निर्माण व्हावी': रवी परांजपे

साहित्य परिषदेत दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण


पुणे : साहित्य म्हणजे संस्कृती नव्हे सर्व सामान्यांपर्यंत अभिजातता पोहोचविण्याचा मार्ग म्हणजे संस्कृती. आपल्या देशात अर्थशास्त्र शिकवले जाते, पण अर्थनिर्माण शास्त्र शिकविले जात नाही. सर्जनशीलतेला उद्यमशीलतेची जोड दिली जात नाही. समाजात कलात्मक उद्यमशील अभिजातता विकसित झाली नाही, त्यामुळे वाचक निर्माण झाले नाहीत. समाजात कलात्मक उद्यमशील अभिजातता निर्माण व्हावी असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांना परांजपे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह वि. दा. पिंगळे उपस्थित होते.


या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे. अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' मौज या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक 'ललित' या दिवाळी अंकाला, 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'समदा' या दिवाळी अंकाला, 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'साहित्य शिवार' या दिवाळी अंकाला, त्याच बरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक 'अक्षरनामा' या दिवाळी अंकाला देण्यात आले. 'जानकीबाई केळकर' स्मृतिप्रीत्यर्थ 'उत्कृष्ट बालवाङ्मयदिवाळी अंकाचे पारितोषिक' 'मनशक्ती' या दिवाळी अंकाला आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' 'अक्षर' या दिवाळी अंकातील विजय खाडिलकर यांच्या 'आवर्त' या कथेला, तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे 'अनंत काणेकर पारितोषिक' 'शब्दशिवार' या दिवाळी अंकातील डॉ. रणधीर शिंदे यांच्या 'येडापीसा वारा चिकटलेला जन्मभर तुझ्या देहाला' या लेखाला पुरस्कार देण्यात आला. यावेळी मोनिका गजेंद्रगडकर, अशोक कोठावळे, जयराम देसाई, डॉ. वर्षा तोडमल, मनस्विनी प्रभुणे, राम जगताप, यांनी पुरस्कार स्वीकारताना मनोगत व्यक्त केले.

परांजपे म्हणाले, अभिजनांकडे अभिजातता असतेच असे नाही. बुद्धी आणि भावना यांना एकत्रितपणे केलेल्या आवाहनातून वैचारिक अभिसरण घडत असते.

जोशी म्हणाले, "दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकात तेच ते लेखक वर्षानुवर्षे लिहित असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. अशा अंकांनी नव्या लेखकांचा शोध घेतला पाहिजे. दिवाळी अंकांना जाहिरातीच्या रूपाने आर्थिक मदत करणे हे समाजातील धनिकांना आपले सांस्कृतिक कर्तव्य वाटत होते. आज ती भावना राहिली नाही. वाचकांच्या अभिरुचीचा पोत बदलल्यामुळे त्यांना ललित साहित्याचा समावेश असलेल्या दिवाळी अंकांपेक्षा माहितीपर दिवाळी अंकांचे आकर्षण वाटते आहे." वि. दा. पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page