साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात विद्यार्थ्यांचा किलबिलाट
पुस्तकांचे पंख लावून उंच भरारी घ्या : प्रा. मिलिंद जोशी
पुणे : 'तुम्ही कोणत्याही क्षेत्रात करिअर केले तरी साहित्याची कास सोडू नका. एकाच जीवनात अनेक अनुभव देण्याचे सामर्थ्य पुस्तकात आहे. शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनसत्त्वे अन्नातून मिळतात. मन आणि बुद्धीच्या भरण - पोषणासाठी आवश्यक असलेली सत्त्वे केवळ साहित्यातूनच मिळतात. 'पुस्तकांचे पंख लावून उंच भरारी घ्या' असा सल्ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी विद्यार्थ्यांना दिला. बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वकर्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील साठ विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेला भेट देऊन कार्याध्यक्षांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात विद्यार्थ्यांचा किलबिलाट अनुभवता आला. मसापचे कार्यवाह माधव राजगुरू, दीपक करंदीकर, शिरीष चिटणीस, आर. सी . बेटावदकर , प्रमोद नेमाडे, दिनकर लोंढे, शशिकांत ठोंबरे, दीपाली पाटील यावेळी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मुलाखतीद्वारे प्रा. जोशी आणि माधव राजगुरू यांच्याशी संवाद साधला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना का व कोणी केली ? साहित्य संमेलनाची परंपरा कशी सुरु झाली ? संमेलनाच्या अध्यक्षांची निवड कशी होते ? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीच्या चळवळीत आम्ही विद्यार्थी काय करू शकतो ? वाचनाची सवय लागण्यासाठी काय करावे ? मराठी भाषा जपण्यासाठी काय करावे ? लेखक होण्यासाठी काय केले पाहिजे ? असे प्रश्न विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी विचारले. त्याला कार्याध्यक्षांनी मोकळेपणाने उत्तरे दिली.
प्रा. जोशी म्हणाले, "लेखक होण्यासाठी आपल्याला काहीतरी सांगायचे आहे, असे प्रथम वाटले पाहिजे. लेखकांकडे सूक्ष्म निरीक्षण शक्ती असली पाहिजे. आपले विचार आपल्या शब्दात मांडता आले पाहिजेत. भरपूर वाचन करणे जरुरीचे आहे.
राजगुरू म्हणाले, "शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आणि साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी शाळेतच प्रयत्न झाले पाहिजेत. साहित्य परिषद त्यासाठी लेखक तुमच्या भेटीला सारखा उपक्रम राबवित आहे.
मराठी भाषा जपण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेले मंत्र :

मी मराठीतच बोलेन आणि लिहिन असा निश्चय करा.
आपली सही मराठीतच करा.
तुमच्या दिनचर्येत अवांतर वाचन आणि खेळासाठी वेळ द्या.
महिन्याला किमान दोन पुस्तकांचे वाचन करा. वाचलेल्या पुस्तकाविषयीच्या नोंदी वहीत लिहा.
मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या वाढदिवसाला ग्रंथभेटच द्या.

