top of page

मसाप ब्लॉग  

नियोजित अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीबाबत सुनावले खडे बोल

पुणे : 'वाङ्मयीन संस्कृतीची पडझड होत होती. साहित्य क्षेत्रात अपप्रवृत्ती शिरत होती. लोकांना बदल हवा होता. पण, समाजाने चांगल्या माणसांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवले. हा आपला करंटेपणाच आहे,' अशा शब्दांत साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी गेल्या काही वर्षांतील संमेलनाध्यक्षाच्या निवड प्रक्रियेवरून आणि निवडीवरून गुरुवारी खडे बोल सुनावले.


यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सन्मानाने निवड झाल्याबद्दल ढेरे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परिषदेचे कार्यकारी विश्वस्त उल्हास पवार, कवयित्री नीलिमा गुंडी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, वर्षा गजेंद्रगडकर उपस्थित होते. सत्कार सोहळ्याने भारावून गेलेल्या ढेरे यांनी पूर्वीच्या निवडणुकीच्या पद्धतीतील त्रुटींवर भाष्य केले.

'महाराष्ट्रात महावृक्षांसारखी माणसे होती. तपस्वी, निरलस असलेल्या आणि साहित्य बाह्य नसलेल्या लोकांच्या कामामुळे साहित्य परंपरा व संस्कृती घडत गेली. लिहिणे आणि बोलणे हेच त्यांनी आपले काम मानले. पण, आपण त्यांना या पदापासून दूर ठेवले. हा आपला करंटेपणा आहे,' असे टीकास्त्र ढेरे यांनी सोडले.


'फुलांना प्रतिबिंब पाहता येत नाही, ते पाणी नाही विष आहे, असे दुर्गाबाई म्हणाल्या होत्या. आपण समूहजीवनाचे विष करून टाकले आहे. संस्कृतीकडे आणि समूहजीवनाकडे कसे पाहतो, हा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात मोठी माणसे होऊन गेली पण आपण त्यांचे विचार पचवू शकलो नाही. पुरोगामी महाराष्ट्रासाठी मोठी वाटचाल करायची आहे,' अशी टिप्पणी ढेरे यांनी केली. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.


साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षाच्या पहिल्या सत्काराचा मान महाराष्ट्र साहित्य परिषदेचा असल्याने डॉ. अरुणा ढेरे यांच्या सत्कारासाठी परिषदेने जय्यत तयारी केली होती. फुलांच्या पायघड्या घालून आणि औक्षण करून ढेरे यांचे स्वागत करण्यात आले. ढेरे यांचा कौतुक सोहळा अनुभविण्यासाठी माधवराव पटवर्धन सभागृह गच्च भरले होते. पुण्याच्या साहित्य वर्तुळाच्या उपस्थित रंगलेल्या या सोहळ्याने अरुणाताई अधिकच भारावून गेल्या. 'पुरस्कार खूप मिळतात, पण असे प्रेम दुर्मिळ असते,' अशा शब्दांत अरुणाताईंनी भावनेला मोकळी वाट करून दिली.

अरुणा ढेरे म्हणाल्या...

चांगल्या माणसांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवणे, हा आपला करंटेपणा.


संमेलन साधेपणाने व्हावे. ते रसिकांमुळे श्रीमंत व्हावे.

संमेलन नको म्हणणाऱ्यांनी यावे आणि स्वरूप बदलावे.

चांगल्या माणसांचा, रसिकांचा आवाज उठण्याची गरज आहे.

आपण समूहजीवनाचे विष करून टाकले आहे.


'अध्यक्ष वाचकांना परिचित'

'ज्याचे साहित्य वाचले आहे, पुस्तके माहिती आहेत, अशी व्यक्ती अनेक वर्षांनंतर साहित्य संमेलनाची अध्यक्ष म्हणून निवडली गेली आहे,' असा टोला ज्येष्ठ भाष्यकार रामदास फुटाणे यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. 'वाचकप्रिय अध्यक्ष मिळाला आहे. अरुणा ढेरे यांच्याकडे साहित्य परंपरा आहे. कोण अध्यक्ष, असे विचारायची आता गरज नाही. बुकबायंडरसुद्धा अध्यक्ष होऊ शकतो, अशी परिस्थिती होती,' अशा शब्दांत फुटाणे यांनी नेहमीच्या तिरकस शैलीत अनेकांना चिमटे काढले.

.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सन्मानाने निवड झाल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गुरुवारी सत्कार करण्यात आला. साहित्य रसिकांनी पुस्तकांचा अनोखा गुच्छ देऊन ढेरे यांचे अभिनंदन केले. या वेळी प्रकाश पायगुडे, उल्हास पवार व प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page