top of page

मसाप ब्लॉग  

आजही स्त्रीला द्यावी लागते चारित्र्याची परीक्षा : डॉ. अरुणा ढेरे

मसापमध्ये 'सीतेची गोष्ट' या दीर्घकथेचे अभिवाचन

पुणे : सीतेची कथा म्हणजे रामायणाचा शेवटचा भाग. आपण आपल्या काळाच्या बिंदूवर राहून सीतेला आपल्या जगण्याच्या काळाशी जोडून घेऊ शकतो. तो अनुभव सीतेला बघून येतो. सीतेवर ज्याप्रमाणे आरोप करण्यात आले, त्याप्रमाणे आजच्या काळातही स्त्रीवर आरोप होतात. आजही जगभर स्त्रीला आपल्या चारित्र्याची परीक्षा द्यावी लागते. तिच्यावर होणारे आरोप तिला स्वतःला खोडावे लागतात. स्त्रियांबद्दल आजही अत्यंत चुकीच्या कल्पना आहेत. आजही चारित्र्याची परीक्षा स्त्रीला द्यावी लागते. असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कथा सुगंध या कार्यक्रमात 'सीतेची गोष्ट' कथेच्या कथेमागची कथा त्या उलगडून सांगत होत्या. यावेळी डॉ. अरुणा ढेरे यांच्या 'सीतेची गोष्ट' या दीर्घकथेचे अभिवाचन डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे व सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित होते.

डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, 'की एखादा लेखक परत त्या गोष्टीकडे पाहतो, स्वतः पुनर्रचना करतो. रामायण, महाभारत वाचतो त्या वेळी त्यांचे नव्याने अर्थ प्रतिपादन करतो. काळानुसार कथा जिवंत करण्याचे सामर्थ्य लेखकात असते. सीतेवर सलग कविता लिहिल्या होत्या. त्या अपुऱ्या वाटल्या म्हणून आणखी जे लिहायचं होत ते आणखी म्हणजे सीतेची कथा आहे. सीता ही भूमिकन्या आहे असे मानतात. सीता म्हणजेच नांगराची तास. सीता ही रामाच्या मंदिरात आपल्याला कधी दिसत नाही. ती रानावनात, चुलीवर काम करणारी, दगडात काम करणारी सीता दिसते. त्यामुळे ही कथा जिवंत परंपरेत पकडता आली. स्त्रीला घरातला, बाहेरचा वनवास भोगावा लागतो. यातून सीतेचा वनवास दिसून येतो. या जिवंत पारंब्या या कथेतून पकडता आल्या.' प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page